रावेर (प्रतिनिधी) – शहरातील एक तरुण गुढरित्या बेपत्ता झाला असून त्याची हरविल्याची नोंद रावेर पोलीस स्टेशनला सोमवारी १९ रोजी करण्यात आली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी, दोन दिवस माझी वाट पहा, अन्यथा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन टाका असे सांगून हा तरुण निघून गेला आहे. त्यामुळे बेपत्ता होण्यामागील नक्की कारण काय ? याचे गूढ निर्माण झाले आहे.
काशिनाथ रामसिंग बारेला (वय ४०, रा. श्रीराम नगर, रावेर) हे राहत्या घरून बेपत्ता झाले आहे. ते ट्रॅक्टर चालक आहेत. त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरून ते मुलांना सांगून गेले कि, मी आता घरुन निघून जात आहे. माझी दोन दिवस वाट पहा. नंतर पोलीस स्टेशनला तक्रार करुन टाका, असे सांगून जावई मिस्तरी रामसिंग बारेला यांचे दुचाकी क्र. (एमएच १९ डीझेड ९८४६) सोबत घेवून घरून निघून गेले. अद्याप पावेतो ते मिळून आले नाही.
त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या खबरीवरून रावेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. तपास पोना सुरेश मेढे करीत आहेत. कुणाला बेपत्ता व्यक्तीविषयी माहिती असल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.