मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकारण सगळीकडे तापत आहे. ठाकरे- शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. अशात आता ठाकरे गटाकडून कोकणातील खासदारानी शिंदे गटाचे २२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, ९ खासदार देखील संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. शिंदे गटाचे २२ आमदार हे वैतागून गेले आहे. ते शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. तर १३ पैकी ९ खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. खासदार शिंदे गटाला वैतागले आहे. त्यांची कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळते. कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार आमदार खासदार करत आहे. पंधरा दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवून इकडे आमची गळचेपी होत असल्याचे सांगितले. तसेच तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी देखील त्यांची खंत बोलून दाखवली आहे. तानाजी सावंतांना बजेट मिळत नसल्याने आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचे सावंत म्हणत आहेत. शिंदे गटाच्या आमदार, खासदारांची कोंडी होत असून भाजपने त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.