जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुनसगाव येथील पेपर मीलला रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता भीषण अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संध्याकाळपर्यंत एकूण २५ ते ३० आगीचे बंब लागले आहेत.
सुनसगाव शिवारातील गट नं. १०८ मध्ये राजेंद्र चौधरी यांच्या मालकीची सुदर्शन पेपर मिल आहे. या ठिकाणी ड्युप्लेक्स नावाच्या इम्पोर्टेट पेपरची निर्मिती होते. देशात मोजक्याच ठिकाणी या पेपरची निर्मिती होते. त्यानुसार सुदर्शन पेपर मिलमध्ये या पेपरची निर्मिती होत विदेशात हा पेपर निर्यात होते. रविवार असल्याने दि. २८ रोजी कंपनी बंद होती. दरम्यान, सकाळी ११ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. आग इतकी भिषण होती की, सर्व सामग्री जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या घटनेत कंपनीत तयार झालेला जवळपास ४५० टन ड्युप्लेक्स पेपरचा माल, कच्चामाल, यंत्र सामग्री आदी कोट्यवधीचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भिषण होती की, दुरवरुन सुध्दा आगीचे लोळ दिसत होते.
आगीची घटना लक्षात येताच स्थानिक नागरीकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तसेच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या, भुसावळ नगरपालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. परंतू ही आग मोठी असल्याने दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
घटनेची माहीती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार, पोहेकॉ. सुरज पाटील, गणेश गव्हाळे, जगदीश भोई यांच्यासह पथक, तलाठी जयश्री पाटील, सर्कल योगिता पाटील, महावितरणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी भुसावळ, दीपनगर, जळगाव या ठिकाणाहून अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. जळगाव मनपाचे अग्निशमन दलाचे कर्मचारी नासिर अली, राजू चौधरी, पन्नालाल सोनवणे, प्रकाश चव्हाण, विक्रांत घोडेस्वार, विजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.