जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील कासमवाडी येथील एका रिक्षा चालकाने शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २३ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे.
संजय चावदस सपकाळे (वय-५५, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव, ह.मु. कासमवाडी जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान इतर भावांना शेतातील वाटे हिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावांशी भांडण होते.
दरम्यान, मंगळवारी २३ मे रोजी सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला, या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून चालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धाव घेतली होती. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शांताराम सपकाळे, राहुल सपकाळे, आधार सपकाळे यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत संजय सपकाळे यांची पत्नी कल्पना व मुलगी खुशी यांनी केला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.