जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील पहूर कसबे येथील २३ वर्षीय तरुणाने वायरचा गळफास करून जीवनयात्रा संपविण्याची घटना पळसखेडा, ता . सोयगांव शिवारात घडली. डॉ. स्वप्निल घोडे यांनी दिलेल्या खबरीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्षय संतोष सोनवणे हा तरुण पळसखेडा येथील आत्या चंदाबाई क्षीरसागर यांच्याकडे मजुरी करण्यासाठी राहत होता. अधून-मधून तो गावी पहूरला यायचा. दरम्यान बुधवारी १७ मे सकाळी साडेसहाला मजूरीवर न जाता तो पहूरला गावी जातो; असे सांगून आत्याच्या घरून निघाला. मात्र तो पहूरला पोहोचलाच नाही. वाटेतच पळसखेडा शिवारातील संतोष बोऱ्हाडे यांच्या शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून त्याने मृत्यूला कवटाळले.
अक्षयने या अगोदरही चार वेळा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कधी भावाने तर कधी शेजारच्यांनी त्याला यातून बाहेर काढले होते. आज मात्र त्याने आत्महत्येचा केलेला प्रयत्न अखेरचा ठरला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अक्षयच्या अकाली जाण्याने आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निलेश लोखंडे करीत आहेत.