जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील धरणगाव शहरात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. ऐन उन्हाळ्यात 20 ते 22 दिवस उलटून देखील नळांना पिण्याचे पाणी येत नाही. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतायत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी दुपारी थेट नगरपालिकेवर धडक दिली. त्या ठिकाणी मुख्याधिकारी न भेटल्याने महिलांना संताप अनावर झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नगरपालिकेत दाखल झाले होते. आठवडाभरात धरणगाव शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपुर्वी शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासकांना पाण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले. तरी सुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असतील. तर त्याला जबाबदार कोण ? शिंदे सरकारच्या पालकमंत्र्यांचे मतदार संघात लक्ष नाही काय ? नगरपालिकेवर प्रशासक असल्याने यांच्यावर अंकुश कोणाचा असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी नगरसेवक जितेंद्र धनगर व विनोद रोकडे यांनी महिलांना शांततेचे आवाहन केले.