जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलीसांनी जळगाव शहरातील पिंप्राळा आठवडे बाजार आणि महाबळ परिसरातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल चोरीचे ४२ मोबाईल हस्तगत केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंप्राळा आठवडे बाजार आणि महाबळ परिसरातून अनुक्रमे ७ एप्रिल आणि १३ एप्रिल रोजी दोन जणांच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील ४ संशयित आरोपी आणि ६ अल्पवयीन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील सर्व संशयित आरोपी हे झारखंडस राज्यातील रहिवाशी असून त्यांच्याकडून चोरीचे एकूण ४२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लहान बालकांना हाताशी घेऊन मोबाईल चोरी व जबरी चोरी करत असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई रामानंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, पोलीस नाईक, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, दीपक वंजारी, चालक संतोष पाटील यांनी कारवाई केली. अटकेतील संशयित आरोपींनी विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.