यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस, निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने प्रतिमेचे शुद्धीकरण केले. घटनेची माहिती मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल ते दहिगाव सावखेडा बससेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे.