मुंबई (प्रतिनिधी) – आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विविध कारणामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी २ मार्च रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे दोन वर्ष राज्यात सरकारी नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थांना आता अर्ज करता येत नव्हते. वय संपलेल्या विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक जारी करून वयाची मर्यादा शिथिल केल्याचे जाहीर केले आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून विविध पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींना विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे.