अमरावती (प्रतिनिधी) – भाजपमध्ये आल्यावर कुणाचीही कारवाई बंद झाली नाही, असे असेल तर विरोधकांनी उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहे. तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीआहे.
देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह ९ नेत्यांनी पत्रावर सही केली आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत ते बहुतांश विरोधी पक्षांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याविरुद्ध तपास मंदावला आहे, अशी तक्रार देशातील विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. जे गैरमार्गाने पैसे कमावतात. त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. असे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे. भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा, हे सगळ बंद केले पाहीजे.