जळगाव ( प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे या वर्षाचा दिला जाणारा कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दिला जाणार असून याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार देखील दिले जाणार आहेत.
विद्यापीठाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार दिला जातो. यंदा राज्यस्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मु. पो.झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या संस्थेला जाहीर झाला आहे. कोकणासारख्या दुर्गम भागात ही संस्था बायोगॅस, कुक्कटपालन, श्वेतसंवाद आदी क्षेत्रात सामाजिक परिवर्तनाचे काम करीत आहेत.त्यामुळे या संस्थेला निवड समितीने पुरस्कार जाहीर केला असून रू. ५१ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा. एन.के. ठाकरे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा पुरस्कार दिला जाणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहणार असून प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती असणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
याच समारंभात सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षातील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार तसेच संशोधन पुरस्कारही दिले जाणार आहेत. ऑगस्ट महिन्यात या पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाने केली होती. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.