चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – भल्या पहाटे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज तालुक्यातील मांदूरणे शिवारात घडली . या तरुणाच्या मृत्यूला महावितरणचा गलथान कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे .
चाळीसगाव – मालेगाव मार्गावरील मांदूरणे शिवारातील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी नितीन नाना नामेकर ( वय २३ ) गेला होता . त्याच्या शेतातील एका विजेच्या खांबावरील चिनी तुटल्याने तारा शिथिल झाल्या होत्या त्यामुळे अर्थिंगच्या तारेत करंट उतरला होता या अर्थिंगच्या तारेला नितीनचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा धक्का बसला . या धक्क्यातच त्याचा मृत्यू झाला . शेतातील म्हैशीचे दूध काढण्यासाठी नितीनच्या शेताजवळून जात असलेले आबा माळी याना नितीन शेतात निपचित पडलेला पहिल्यांदा सकाळी ७ वाजता दिसला त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली . मेहुणबारे पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून नितीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रूग्णालयात पाठवला नितीनच्या पश्चात आई – वडील , एक विवाहित बहीण आणि थोरला भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.