पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिकविमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांना भरपाईची उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे .
याआधी खरीप हंगाम २०२१ अंतर्गत उत्पन्नावर आधारित भरपाई मिळावी म्हणून पिकांचे खरीप हंगामात सुरवातीला पडलेल्या पावसामुळे खंड तसेच नंतर झालेली अतिशवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी.याकरिता भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मागणी केली होती. संबंधित विमा कंपनी (ICICI Lombard General Insurance Company Ltd.) ने तात्काळ भरपाई द्यावी अशीदेखील मागणी केली होती.
सततच्या पाठपुराव्याने पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना व प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील पात्र ७७१ शेतकऱ्यांना ८५ लाख २८ हजार २९८ रुपये तसेच वैयक्तिक नुकसान व सॅम्पल सर्वेनुसार झालेल्या नुकसानी करिता ४४६० शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ५० हजार ४२८ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नव्हती. नुकसानीची रक्कम निश्चित करताना आवश्यक संकलन देखील जिल्ह्यात पूर्ण झाले होते. भाजपाच्या अमोल शिंदे यांनी २१ मार्चरोजी जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यावर भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली
उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी या पिकांची भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दहा दिवसांच्या आत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल तांत्रिक अडचणी उद्भवल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अमोल शिंदे यांनी सांगितले.