जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांसाठी व्याज व विलंब आकारात माफीसह पुनर्जोडणीची संधी दिली आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत 418 ग्राहकांनी या योजनेत १८ लाख रुपयांची सवलत मिळवली आहे.
थकबाकीपोटी 31 डिसेंबर 2021 पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असलेल्या ग्राहकांसाठी (कृषी ग्राहक वगळून) ही योजना लागू आहे. सर्व पात्र ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा केलेली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव व टाळेबंदी कालावधी यांचा परिणाम अर्थचक्रावर होऊन ग्राहकांच्या वीजबिलांच्या थकबाकीत वाढ झाल्याने अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे.
या योजनेची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. ग्राहकांना मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागेल. मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के व लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मूळ रकमेत अधिकची सवलत मिळेल. सुलभ हप्त्याने थकीत रक्कम भरावयाची असल्यास मूळ थकबाकीच्या 30 टक्के रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम 6 हप्त्यात भरता येईल. योजनेत ग्राहकांना पुनर्जोडणीसाठी शुल्क व अनामत रक्कम भरणा करावी लागेल. वीजजोडणी पूर्ववत झाल्यानंतर चालू वीजबिल व मूळ थकबाकीच्या हप्त्यांची रक्कम नियमित भरणे अनिवार्य आहे.
महावितरणने थकबाकी वसुलीसाठी न्यायालयात दावा दाखल केला असल्यास ग्राहकांस अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च) देणे आवश्यक राहिल. महावितरणच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणास 12 वर्षाहून अधिक कालावधी झाला नसेल व लाभार्थी ग्राहकाने अपिल दाखल केले नसेल तर अशा ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. न्यायालयात वाद चालू वा प्रलंबित असलेल्या प्रकरणातील ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक ग्राहकांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयास वा संकेतस्थळाला भेट द्यावी.
जळगाव परिमंडलातील 3 लाख 1 हजार 783 कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित वीजग्राहकांकडे 319 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. 255 कोटी 89 लाख रुपयांची मूळ थकबाकी भरल्यास ग्राहकांना या योजनेत विलंब आकार व व्याजाची सुमारे 63 कोटी 75 लाख रुपये माफी मिळणार आहे. गेल्या अडीच महिन्यांत जळगाव परिमंडलात 418 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी 1 कोटी 90 लाख 78 हजार रुपयांची मूळ थकबाकी भरल्याने त्यांना विलंब आकार व व्याजाची 18 लाख 16 हजार रुपयांची रक्कम माफ करण्यात आली आहे.