कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे.
ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी होती. पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केला होता.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.
“कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती,” अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली.