जळगाव ( प्रतिनिधी ) – वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू आपण प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केले.
या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्याला मान्यता दिली. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी संप मागे घेतील, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला.
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, वीज कंपनी व्यवस्थापनाच्या असंवेदनशील धोरणाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. उष्णतेचा प्रकोपही वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर चर्चेतूनच मार्ग निघतो. तुम्ही बैठकीची वेळ निश्चित करा, शक्य असेल तर उद्या मंत्रालयात दुपारी बैठक बोलावतो. तुम्ही प्रतिसाद देऊन बैठकीला हजर रहा आणि संप मागे घ्या, असे आवाहन त्यांनी केले. संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले.