औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – मराठवाड्यातील उद्योग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.
या परिसरातील ज्या रेल्वेमार्गाची कामं पूर्वी झाली आहेत, ती जशीच्या तशी ठेवत, इतर कोणत्याही मार्गात हस्तक्षेप न करता मराठवाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येईल, अशी माहिती दानवे यांनी मुंबई येथे दिली. रेल्वेच्या 8 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असेही ते म्हणाले.या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि राजूरचा गणपतीदेखील रेल्वेशी जोडले जाणार आहे.
जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव पर्यंत जाणार आहे. राज्यातील भाविक आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. 70 टक्के मार्ग जालना लोकसभा मतदार संघातून जात आहे. याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.