जळगाव ( प्रतिनिधी ) – नूतन मराठा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीपासून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीदरम्यान कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवसांच्या या ज्ञानयज्ञाचा समारोप जिजाऊ आणि विवेकानंद जयंतीदिनी करण्यात आला.
व्यख्यानमालेच्या या समारोप सोहळ्यात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांच्या हस्ते जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, अध्यक्ष प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांचे स्वागत उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांनी केले, प्रा भाग्यश्री पाटील यांच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रारंभी उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांनी राजमाता जिजाऊ यांचे स्फुर्ती काव्य सादर केले.व्याख्यानमालेची आजची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत असलेल्या प्रा पल्लवी शिंपी यांनी ‘मी राजमाता जिजाऊ बोलतेय’ या वाक्याने केली आणि सभागृहाला चुटकीसरशी शहारे आले.प्रा पल्लवी शिंपी यांनी जिजाऊंच्या भुमिकेत जाऊन जो संवाद साधला तो एक अन् एक क्षण टीपण्यासारखा होता. बालपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊंचे बालपण ते वय वर्षे ८८ पर्यंतचे शहाणपण आणि तरुणपण त्यांच्या एकेका शब्दांत जाणवत होते ज्यात म्हातारपणाचा लवलेशही नव्हता. शिवबाची जडणघडण, त्या काळात सती न जाण्याचा घेतलेला निर्णय, शिवाजी महाराजांच्या सात विवाहामागील कुळ, फौजफाटा आणि वतनातील वृद्धीची संकल्पना, स्वप्नातील स्वराज्य सत्यात उतरेपर्यंत रोखून ठेवलेला श्र्वास, अठरापगड जातींचे संवर्धन, रयतेचे वालीत्व अशा अनेक अंगानी त्याग आणि शौर्याने लढा देणारी जिजाऊमाता प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी करत प्रा पल्लवी शिंपी यांनी अभ्यासपूर्ण भाषणाचा समारोप केला.
त्यानंतर भगवा पायजमा कुडता, डोक्यावर फेटा अन कमरेला फटका बांधून ” उठा तरुणांनो जागे व्हा अन् जोपर्यंत ध्येय्य प्राप्त होत नाही तोवर थांबू नका, नमस्कार “मी स्वामी विवेकानंद बोलतेय” अशी सुरुवात करत प्रा जगदीश सोनवणे यांनी भाषणाला सुरुवात केली. तरुणांनो माझी ओळख नुसती शिकागो येथील धर्मसभेतील भाषणा पुरती मर्यादीत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा शोध घ्या, मी रामकृष्ण मिशन ची स्थापना यासाठी केली की, निराश्रित व्यक्तीला अभय देवून मानवतेची सेवा करावी, तुमच्यातील भीती आणि भय नरकाप्रमाणे असून ती मृत्यूचे कारण आहे, सामर्थ्य हेच खरे जीवन असून दुर्बलता हा मृत्यू आहे, दारिद्र्य आणि अज्ञान घालवणे हीच खरी देशसेवा आहे, युद्धात जिंकायचं असेल तर ढाल आणि तलवार आवश्यक आहे म्हणून तुम्ही इंग्रजी आणि संस्कृत भाषा शिकले पाहिजे. याचाच अर्थ असा की त्या काळात या प्रमुख दोन भाषिकांची या देशात सत्ता होती सत्तेच्या विरोधात लढायचं असेल तर त्या सत्ताधिशांची भाषा अवगत असणे गरजेचे आहे असे विवेकानंदाचे मौलिक विचारातून प्रा जगदीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रा वंदना पाटील यांनी गेल्या दहा दिवसांतील अनुभव थोडक्यात कथन केले..
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. या व्याख्यानमालेत सावित्रीबाई फुले, महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, झाशीची राणी, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक,कमला भसीन,पंडिता रमाबाई, बहिणाबाई चौधरी, डॉ आनंदीबाई जोशी, मलाला युसुफजाई आणि फातिमा शेख यांच्या यशोगाथा सांगण्यात आल्या. सूत्रसंचालन सहाय्यक प्रा पौर्णिमा देशमुख यांनी केले संयोजिका डॉ इंदिरा पाटील यांनी आभार मानले
या प्रसंगी प्राचार्य डॉ एल पी देशमुख, उपप्राचार्य डॉ एन जे पाटील, उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा आर बी देशमुख, उपप्राचार्य डॉ एस ए गायकवाड, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते..