भोपाळ ( वृत्तसंस्था ) – रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमधील वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतला आहे. या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षचा हार घातला आहे. वेटर साधूंच्या वेशात लोकांना जेवण देत आहेत, तेच लोक खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत.
हा आमचा अपमान असल्याचे साधूंचं म्हणणे आहे. ट्रेन वेटर्सनी इतर कुठल्यातरी रंगाचे कपडे घातले पाहिजेत. उज्जैनच्या साधूंनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वेच्या पुढील प्रवासाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. संतप्त साधूंनी ट्रेन थांबवण्याचीही भाषा केली आहे.
आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा १२ डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनसमोर हजारो हिंदूंच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे नेपाळला नेले जाते. नंतर प्रवाशांना काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.