मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये आणि अलगीकरणाची (क्वॉरंटाईन) सुविधा असलेल्या ठिकाणी आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. म्हणजेच आता प्रत्येक खाटांवर आता ऑक्सिजन मास्क लावण्यात येईल आणि ऑक्सिजन पुरवठ्याची सोय त्याठिकाणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलतांना दिली आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना उपचारासाठी व्हेंटीलेटवर भर देण्याऐवजी रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सुचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक बेडजवळ ऑक्सिजन मास्क असेल आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येईल. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. यासाठी मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरुवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता 7 दिवसांवर गेला आहे. तसेच हा दर 20 ते 25 दिवसांवरती यावा यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.