लखनऊ ( वृत्तसंस्था ) – उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य व माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा चर्चेत आले आहेत. रिझवी यांनी मृत्युपत्र तयार केले असून त्यांनी आपल्या मृत्युपत्रात आपले पार्थिव दफन करण्या ऐवजी स्मशानभूमीत दहन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

डासना मंदिराचे महंत नरसिंह नंद सरस्वती यांच्या हस्ते माझ्या पार्थिवाला मुखाग्नि दिली जावी, असेही रिझवी यांनी या मृत्युपत्रात म्हटले आहे.
वसीम रिझवी यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, ‘मी कुराणच्या 26 आयातींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यात मानवतेबद्दल द्वेष पसरला होता. आता मुस्लिमांना मला मारायचे आहे, म्हणून मला मारण्याचा कट देशात आणि देशाबाहेर रचला जात आहे. मला कोणत्याही दफनभूमीत जागा देऊ नये, अशी घोषणा केली जात आहे. माझ्या मृत्यूनंतर शांतता असावी, म्हणून मी एक इच्छापत्र लिहून प्रशासनाला पाठवले आहे की, माझा मृतदेह लखनऊमध्ये राहणाऱ्या माझ्या हिंदू मित्राला देण्यात यावा आणि अंत्यसंस्कार करण्यात यावे. अग्नी स्वामी नरसिंहानंद देतील.’
वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कुराणातील 26 आयाती काढून टाकण्याची विनंती केली होती, मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर ते मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक संघटनांनी त्याच्या अटकेची मागणीही केली होती.







