मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – विरोधक जिल्हा बँकेने खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत. परंतु, रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. कर्जफेड नियमित असल्याने मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले. ते खडसे फार्म येथे मतदार मेळाव्यात बोलत होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, स्व. प्रल्हाद पाटील, जे. एस. अप्पा, ओंकारअप्पा वाघ यांच्यासारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला लौकिक प्राप्त करून दिला. मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती. ती सुस्थितीत आणण्यासाठी मागच्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली. रोहिणी खडसे चेअरमन झाल्या सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन संचित तोटा ६०० कोटीपर्यंत भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत.विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करावी येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल याची मी ग्वाही देतो. गेल्या संचालक मंडळाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवली. बँकेचे संगणकीकरण करून कारभार जलद गतीने केला. सर्व व्यवहार नियमानुसार केले. त्यामुळे बँक एनपीए मधून बाहेर आली. मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला बँक अ वर्गात आली. हे सर्व सभासदांच्या सहकार्याने, विश्वासाने शक्य झाले.
महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताईला नारळ वाढून करण्यात आला. त्यानंतर मतदारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे डॉ. जगदीश पाटील, संजय पवार, नाना पाटील, संजय गरुड, रोहिणी खडसे खेवलकर, शिला निकम, मेहताबसिंग नाईक, श्यामकांत सोनवणे, विनोद तराळ, रवींद्र पाटील, वंदना पाटील, एजाजभाई मलिक, मंगला पाटील, कल्पिता पाटील, सरिता माळी, वाल्मिक पाटील, रमेश पाटील, डी. के. पाटील, सोपान पाटील, ईश्वर रहाणे, यू. डी. पाटील, निवृत्ती पाटील, सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजू माळी, शिवराज पाटील, अरविंद गोसावी यांची उपस्थिती होती.







