पाळधी (प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर खालच्या भाषेत टीका करत भाजपनेते निलेश राणे यांनी कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याने येथील मुस्लीम समुदायातून तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. आज शहरातून मोर्चा काढून राणेंच्या प्रतिमेला चपला – जोड्यांचा मार देऊन त्यांचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणबाजीने परिसर दणाणून निघाला होता.
भाजप नेते निलेश राणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती. ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील कार्यक्रमात कव्वाली गायन केल्यामुळे ही टीका करण्यात आली होती. याचा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. याचीच तीव्र प्रतिक्रिया पाळधी येथेदेखील उमटली.
पाळधी येथे माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायायसह सर्वधर्मिय नागरिकांनी मोर्चा काढून निलेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढण्यात आला. राणेंच्या प्रतिमेला चपला-जोड्यांचा प्रसाद देऊन निषेध करण्यात आला.
ना. गुलाबराव पाटील हे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असून त्यांनी मुस्लीम समुदायाबाबत नेहमी न्यायाची भूमिका घेतली आहे. कव्वाली मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असून अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये कव्वालीचे गायन करण्यात येते. मात्र निलेश राणे यांच्या मनात मुस्लीम समुदाय आणि ना. गुलाबराव पाटील यांच्याबाबत मळमळ असल्यामुळे त्यांनी घृणास्पद टीका केली असल्याचा आरोप आंदोलकांनी दिला. राणेंनी आपल्या जीभेला आवर घातला नाही तर मुस्लीम समुदाय अजून तीव्र आंदोलन करेल असा इशारादेखील देण्यात आला.
या निषेध आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच हाजी सुलतान पठाण , हाजी फिरोज खान, हाजी यासीन पठाण, दानिश , माजी सरपंच अरुण पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख पिंटू कोळी , नारायण आप्पा सोनवणे, उद्योगपती दिलीप पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी , प्रशांत झंवर, माजी सरपंच अलीम देशमुख, पप्पू शिंदे, धर्मेंद्र कुंभार, माजी सरपंच सोपान पाटील, किरण पाटील,सुरेश पाटील, बंडू नारखेडे, विभाग प्रमुख गोकुळ लंके, गोकूळ पाटील, आत्मा तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील, संगोयोचे सदस्य संजय माळी, फुलपाटचे सरपंच हरिभाऊ पाटील, तुषार मोरे, सुनील भोई, सचिन माळी, सचिन माळी, शेख कालू, शेख शाकिर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.