जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांकडे मोठी पदे असूनही त्यांचा जिल्हा बँकेच्या सत्तेचा अट्टाहास सुटत नाही आणि त्यांच्या या धोरणामुळे सर्वच पक्षांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पदांची संधी मिळत नाही म्हणून प्रस्थापितांशी संघर्षासाठी ‘ शेतकरी विकास पॅनल ‘ आम्ही काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचेही लोक सोबत घेऊन मैदानात उतरवले आहे , असे आज डी जी पाटील यांनी माध्यमांना सांगितले .हे पॅनल ७ जागा लढवणार आहे .

डी जी पाटील यांनी पुढे सांगितले की , शेतकरी विकास पॅनल खुल्या प्रवर्गातील ६ व सोसायटी मतदारसंघातील २ जागा लढवणार आहे . या पॅनलला मोटारगाडी चिन्ह मिळाले आहे . सर्वच पक्षांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पदांची संधी मिळत नाही , या मताचे आम्ही लोक आता एकत्र आलो आहोत सातत्याने तेच तेच लोक जिल्हा बँकेत सत्तेवर येतात पक्षाशी काहीच संबंध नसलेल्या शैलजा निकम यांना काँग्रेसने एका रात्रीतून उमेदवारी कशी दिली ? यावलचे विनोद पाटील यांच्याही बाबतीत तसेच आहे राष्ट्रवादीतही कल्पना पाटील , विकास पवार यांच्या बाबतीत असेच झाले आमदार , मंत्री जिल्हा बँकेला वेळ देऊ शकत नाहीत तरीही त्यांचा जिल्हा बँकेचा अट्टाहास जात नाही . प्रस्थापित लोक पदे सामान्य कार्यकर्त्यांना का देत नाहीत ? त्यामुळे आम्ही हा संघर्षाचा निर्णय घेतला आहे . जिल्हा बँकेचा एन पी ए आज ५२ ते ५५ टक्के आहे रवींद्र सूर्यभान पाटील ( इतर संस्था मतदारसंघ ) भाजपचे असले तरी आमच्यासोबत आहेत आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात प्रचार करू
शेतकरी विकास पॅनलमध्ये काँग्रेसच्या अरुणा दिलीपराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास मुरलीधर पवार , काँग्रेसचे विकास ज्ञानेश्वर वाघ , राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना शान्ताराम पाटील , भाजपचे रवींद्र सूर्यभान पाटील , काँग्रेसचे राजू रघुनाथ पाटील व सुरेश श्यामराव पाटील हे उमेदवार आहेत .
या पॅनलचे प्रतिस्पर्धी सहकार पॅनलचे ९ उमेदवार मैदानात आहेत त्यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे . जनाबाई गोटू महाजन , विनोद पंडितराव पाटील , घनश्याम अग्रवाल , गुलाबराव देवकर , रोहिणी खडसे – खेवलकर , शैलजादेवी दिलीपराव निकम , श्यामकांत बळीराम सोनवणे , मेहेताबसिंग रामसिंग नाईक , सतीश भास्करराव पाटील हे सहकार पॅनलचे उमेदवार आहेत .
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी १५ तालुक्यांमध्ये १५ मतदानकेंद्रे राहणार आहेत २१ तारखेला मतदान झाल्यानंतर २२ तारखेला मतमोजणी होणार आहे . या निवडणुकीत एकूण २८५३ मतदार मतदान करणार आहेत . ४२ उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप करण्यात आले.







