मुंबई ( प्रतिनिधी ) – आजपासून राज्यातील एसटी वाहतुक सुरळित सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र आजही अनेक एसटी डेपोत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे.
काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत काही मागण्या मान्य केल्या. काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करू असे सांगत आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही केलं. एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केलं.
विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधीत जिल्ह्यात सामान्यांना बसला असून म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.