पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने शासन निर्णयाचा जीआर जारी
जळगाव ( प्रतिनिधी ) – अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी राज्य सरकारने वाढीव मदत जाहीर केली पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला आहे. राज्य शासनाने या मदतीचा जीआरदेखील जाहीर केला मदतीत जळगाव जिल्ह्याचा समावेश झाला आहे
जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार असून कुणीही भूलथापांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्य शासनाने २६ ऑक्टोबररोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला. यात राज्यातील ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीतील नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून २१ ऑक्टोबरच्या निर्णयानुसार वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५ टक्के म्हणजे २ हजार ८६० कोटी ८४ लक्ष ७ हजार निधी वितरीत करण्यात आला. यात जळगाव जिल्ह्याचा समावेश नव्हता.
बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांची अतिवृष्टी व पुराने मोठी हानी झाली असून त्यांना दिवाळीआधी वाढीव दरानुसार भरपाई मिळावी अशी मागणी केली. दुपारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतसुध्दा त्यांनी हा प्रश्न लाऊन धरला. मंत्रीमंडळाने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना वाढीव दरानुसार भरपाई देण्याला मान्यना देऊन बुधवारी रात्री जीआर जाहीर करून जळगावसह नऊ जिल्ह्यांमधील शेतकर्यांसाठी ७७४ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांना ही रक्कम टप्याटप्याने मिळणार आहे पालकमंत्री म्हणाले की, काहीजण जिल्ह्यातील शेतकर्यांना मदत मिळणार नसल्याच्या अफवा पसरवत होते. मात्र आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकर्यांची व्यथा सांगितली. मंत्रीमंडळातही प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जीआरदेखील जाहीर केला आहे.