जळगाव ( प्रतिनिधी ) – महिला बचत गटांचे कर्ज माफ होत नसेल इच्छामरणाची परवानगी द्या असा संताप व्यक्त करणारे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना येथील नियोजित पीपल्स फाउंडेशनच्या प्रमुख गायत्री सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठवले आहे

जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , अशा आशयाचे निवेदन यापूर्वी २५ ऑगस्टरोजीही देण्यात आले होते मात्र त्याची दाखल घेतली गेली नाही . कोरोना टाळेबंदीच्या काळात सामान्य लोकांची थोडीफार बचत आवश्यक गरजांसाठी संपून गेली आहे कामधंदा नसल्याने सगळे अजूनही हतबल झालेले आहेत आजारपण , शिक्षण , दैनंदिन खर्च थांबलेले नाहीत आणि उत्पन्नाचे साधन नाही अशा कचाट्यात सापडलेल्या हातावरचे पोट असलेल्या लोकांना घरभाडे द्यायलाही पैसे राहिलेले नाहीत . अशा कुटुंबातील महिलांनी लहान मोठ्या व्यवसायासाठी घेतलेले बचत गटांचे कर्ज थकलेले आहे ते त्यांनी मुद्दाम थकवलेले नाही त्यांना व्यवसाय करताच आलेला नाही अशा हताश झालेल्या कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत बचत गटांचे कर्ज वसूल करण्यासाठी लोक तगादा लावत आहेत या कर्जदार महिलांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा छळ केला जातो आहे . त्यांना बचत गटांचे कर्ज माफ करून आणखी एक संधी देण्याची नितांत गरज आहे
या निवेदनावर गायत्री सोनवणे , चारुलता सोनवणे , संयम महिला बहुउद्देशीय संस्थेच्या रुबिना , फिरोज पिंजारी , छावा युवा मराठा संघटनेचे अमोल कोल्हे , फिरोज शेख , मीरा सोनवणे , सागर कोळी , आशा बडगे , आयेशा मणियार आदींच्या सह्या आहेत .







