जळगाव ( प्रतिनिधी ) – कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून आरोग्य विभागाच्यावतीने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. अद्याप ज्यानी लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी राऊत यांनी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांचेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जिल्ह्यात कोविड-19 लसीचे अडीच लाख डोस आलेले आहेत. आणखी 4 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. लसीकरण मोहीमेस वेग देऊन कोरोना रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोगय यंत्रणेने लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, धार्मिक स्थळे, मंदिरे आदि ठिकाणी लसीकरणासाठी शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 लाख 47 हजार नागरीकांनी पहिला डोस तर 6 लाख 6 हजार नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्यानी पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही पात्र नागरीक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जनजागृतीसाठी शिक्षण विभागाची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात.
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आणि सूक्ष्म नियोजन करावे. लोकसंख्येनुसार शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करावे. प्रत्येक गावाच्या लसीकरणासाठी पथके निश्चित करावीत. लाभार्थ्यांना पहिला डोस प्राधान्याने द्यावा. आरोग्य सेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टरांची मदत घ्यावी. लसीकरणासाठी लाभार्थ्यांना बोलावणे, बैठक व्यवस्था आदीं अन्य विभागाच्या सहकार्याने करावी. उपलब्ध लससाठ्यानुसार पुढील तीन- तीन दिवसांचे नियोजन करावे. सण, उत्सवाचे दिवस लक्षात घेता व्यावसायिकांनी आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, कामगार यांचे लसीकरण तातडीने करुन घ्यावे. लसीकरण झालेले नसताना कामगार कामावर ठेवला असेल तर अशा व्यावसायिकांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. शासकीय व निमशासकीय सेवेतील ज्या अधिकारी व कर्मचारी यांचे अद्याप लसीकरण झाले नसेल त्यांचे वेतन रोखण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सुतोवाचही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.
सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानीही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी. सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आशा वर्कर्स, पदाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याबरोबरच लसीकरणाबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.







