पहूर (प्रतिनिधी) – आई – वडील बाहेरगावी वर्षश्राद्धाला गेले असताना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधार्या पर्यंत खेळत गेलेल्या चिमुकल्या चुलत बहिण – भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जांभूळ येथे घडली.
जांभूळ गावापासून जवळच नितीन जोशी आणि गोरख जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात. गंगापुरी येथील मूळचे रहिवासी असलेले हे भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून चरितार्थ चालवितात. रविवारी शेंगोळा (ता .जामनेर ) येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी पत्नीसह गेले असताना त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत दुपारी घरापासून जवळच सुभाष शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले.
खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हते. सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेचच मुलांच्या आई – वडिलांशी संपर्क केला. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई – वडिलांनी एकच हंबरडा फोडला. पहूरचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हे. कॉ. भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्दैवी आई-वडिलांचे सांत्वन केले.
सायंकाळी दोघा बहिण भावावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जांभूळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.
चिमुकला ६ वर्षीय रुद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो जांभूळ येथील अंगणवाडीत शिकत होता , पायल जांभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या गृह भेटीतून दोघे बहिण – भाऊ अभ्यास करत होते. गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, भानुदास तायडे , मुख्याध्यापक नाना धनगर आणि शिक्षक राजेंद्र भोई ,वर्गशिक्षक भास्कर इंगळे यांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पायलच्या पश्च्यात तीन बहिणी आई – वडील असा परिवार आहेत.