जळगाव (प्रतिनिधी) – आपल्याच नेत्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महानगर पदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांना पत्र दिले आहे.

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याविरुद्ध मागील काही महिन्यांपासून आपल्याच पक्षातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करीत होते. गेल्या महिन्यात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर पण मागील महिण्यात तक्रार करण्यात आली. पक्षातील स्थानिक नेत्यांकडून वारंवार करण्यात येत असलेल्या तक्रारींमुळे पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याची खंत अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अभिषेक पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहर विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर गेल्या १७ महिन्यात मी स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकलो. मी निरपेक्षपणे व निर्भीडपणे पक्षाचे काम केले. आता मला स्वतः पक्षाचे तळागाळात काम करायचे आहे. मला पक्षाच्या महानगराध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे, मी इमाने इतबारे कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करेल असे पत्रात म्हटले आहे.







