जळगाव (प्रतिनिधी) – किर्तनकारांना दिलासा मिळाला असून आता राज्य सरकार कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देणार आहे जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे

कोरोनाकाळात किर्तन बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले होते. त्यामुळे किर्तनकार, टाळकरी यांना आर्थिक मदत मिळावी अशी शासनाला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ६ मे रोजी निवेदन दिले होते
मुख्यमंत्री . उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे निवेदन रोहिणी खडसे खेवलकर यांनी इमेलद्वारे पाठवले होते . त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या कलावंतांना महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
कोरोना काळात राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
आता श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना आर्थिक मदत देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच दिलासादायक असल्याचे, यावेळी रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी सांगितले.







