जळगाव, (प्रतिनिधी ) – नागरी विमानतळ सुरक्षा ब्युरो , भारत सरकार यांच्या सुचनेनुसार विमान अपहरण प्रतिबंध सराव आज जळगाव विमानतळावर यशस्वीरित्या पार पडला
हा सराव आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: विमान अपहरण होण्याच्या सि्थतीमध्ये सुरक्षा संबंधित दले यात महाराष्ट्र पोलीस , बॉम्ब शोध व डिस्पोजल पथक, एअरलाईन्स, आय बी , एम एस एफ , अग्निशमन सेवा, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) , दूरसंचार विभाग, वनविभाग यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि प्रतिसाद याची तपासणी करण्यात आली .

जळगाव विमानतळाच्या यातायात नियंत्रण कक्षामध्ये भोपाळवरुन औरंगाबाद जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाल्याचा पायलटचा संदेश मिळाला, अपहरणकत्यांनी विमानाला जळगाव विमानतळावर लॅन्ड करण्यासाठी पायलटला सांगितले. त्यानुसार विमान जळगाव विमानतळावर उतरवण्यात येऊन त्याला धावपट्टीच्या वेगळ्या सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यास सांगितले. विमानतळ संचालकांनी याची माहिती तत्काळ दूरध्वनीव्दारे विमानतळ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, केंद्रीय तथा राज्य गुप्तचर यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व अन्य संबधित विभाग प्रमुखांना दिली.
अपहरणाची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक व सर्व प्रमुख अधिकारी नियंत्रण कक्षात पोहोचले, जळगाव विमानतळचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुमित कुमार तिवारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य सांगितले.

अपहरणकर्त्यांनी काही मागण्या केल्या त्यांच्या साथीदाराला नागपूर जेलमधून मुक्त करणे, 5 लाख डॉलर्स तत्काळ देण्यात यावे, विमानात लवकरात लवकर इंधन भरण्यात यावे, देशातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी बोलणे करुण देणे आदि मागण्या यंत्रणेसमोर ठेवल्या.
त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपहरणकर्त्याशी वाटाघाटी केल्या त्या बऱ्याच वेळ चालल्या शेवटी विमान प्रवांशासाठी जेवण पाठवण्यासाठी अपहरणकर्त्यांनी परवानगी दिली. त्याचवेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कृती योजना अंमलात आणून कंमाडोसना साध्या वेशात जेवण पुरवण्याच्यानिमित्ताने विमानात पाठवले व सर्व अतिरेक्यांना जेरबंद केले.
हा संपूर्ण सराव 2 तास चालला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. व त्यामध्ये पूर्ण सराव सत्राच्या त्रुटी व सूचना यांची चर्चा करण्यात आली. त्या सुधारण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना सूचित करण्यात आले.
या संपूर्ण सरावाचे संचलन प्रविण महाजन ( अपर जिल्हाधिकारी), चंद्रकांत गवळी ( अतिरिक्त पोलीस अधीक्षक) , श्री. ए. चांडक, कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक प्रताप शिकरे, पोलीस निरिक्षक ( एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सरावाचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जितेंद्र महाजन, हर्षल महाजन, निलेश वतपाल, अश्पाक पिंजारी, संदीप महाजन, अमोल पंडीत, मौजोदीन शेख, विमानतळावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







