मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचं राजकारण करत असल्याची टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे, त्याचं वणव्यात कधी रुपांतर होईल, ते कळणारही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवलं. मराठा आरक्षणाचा कायदा करुन तो ही त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला. मात्र, महाविकासआघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.







