चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- शिवरायांचे मावळे म्हणून आपली जबाबदारी आहे की पंचायत समिती असो की इतर कोणतीही संस्था तेथे येणाऱ्या प्रत्येक शेतकरी, वंचित घटक याला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल, त्याची पिळवणूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. हाच शासनाचा हा शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा उद्देश आहे . तो साध्य करण्यासाठी राजकिय जोडे बाजूला ठेवून जनतेसाठी काम करणे हीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल अशी भावना चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने चाळीसगाव पंचायत समिती येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
पंचायत समिती आवारात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभी करण्यात येऊन त्यावर भगवा स्वराज्यध्वज फडकवण्यात आला. त्याचे पूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटनेते संजय पाटील, सदस्य सुभाष पैलवान, सहाय्यक गटविकास अधिकारी पवार, प्रशासन अधिकारी गांगुर्डे आदी उपस्थित होते.