चोपडा(प्रतिनिधी) ;– हतनुर धरणातून तापी नदीत एक पाणी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी चोपडा तालुकावासियांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी पत्रकान्वये केली आहे.
यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खूपच खोल गेलेली आहे. त्यामुळे सध्या शेतात असलेली केळी, ऊस,पपई व इतर भाजीपाल्यांचे पिकांना पाणी अपूर्ण पडत आहे. तसेच पुढील काळात कापूस व इतर पिके लागवड करतांना सुद्धा पाण्याची गरज भासणार आहे. म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन सोडणे गरजेचे आहे. अशा आशयाचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, पाणीपुरवठा व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगावचे जिल्हाधिकारी , चोपड्याचे तहसीलदारयांना देण्यात आलेले आहे. या निवेदनावर तालुकावासियांतर्फे चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक),आदर्श घुमावल बु.चे सरपंच वसंतराव पाटील, चोपडा राष्ट्रवादीचे माजी तालुकायुवाध्यक्ष दिपकराव सोनवणे(हातेड खुर्द), सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर, वैभवराज बाविस्कर(चोपडा) यांच्या स्वाक्षर्या आहेत.







