मुंबई (वृत्तसंस्था) – तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी मोठं नुकसान झालं. याची भरपाई राज्य सरकारने लवकर द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.
‘नुकत्याच झालेल्या तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी अपेक्षा आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल,’ अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
तौत्के चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच फक्त गुजरात राज्यासाठी मदत ही जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला पत्र लिहावं, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
महाविकासआघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या, तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आला, अशी टीकाही रोहित पवारांनी केली आहे.
तसेच, देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला 5 तर वर्षाला 60 कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, असेही ते म्हणाले आहेत. एकूणच काय तर रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला खोचक सल्ला दिला आहे.







