मुंबई(वृत्तसंस्था ) ;- कोरोनाबाधितांची संख्या देशभरात दिवसेंदिवस वाढतच असताना शक्य त्या सर्वपरिंनी युद्धपातळीवर कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, लसीच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरुन यामध्ये अनेक अडचणी उद्भवताना दिसत आहेत. त्यातच आता लसीकरणाबाबत नवी नियमावली केंद्र सरकारने आणली असून, त्यानुसार यापुढे केंद्राकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा फक्त शासकीय लसीकरण केंद्रावरच वापरला जाईल.

लसींचा ज्या खासगी रुग्णालयांकडे जास्त साठा आहे, तोसुद्धा राज्य सरकार परत घेणार असल्याची माहिती मिळत आहे, पण यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे 1 मेपासून लसीकरण सुरु होणार आहे. याआधीच्या टप्प्यासाठी खासगी रुग्णालयांना राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा करण्यात येत होता. पण, आता लसीकरणाच्या नव्या टप्प्यासाठी लस उत्पादकांना सांगण्यानुसार लसीच्या उत्पादनातील 50 टक्के वाटा हा केंद्राला जाणार असून उर्वरित 50 टक्क्यांमध्ये खासगी रुग्णालय आणि राज्य सरकारला लस घ्यावा लागणार आहे.







