अहमदनगर (वृत्तसंस्था) – राज्यात मनसुख हिरेन यांचा संशयित मृत्यू आणि त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचाच हात असल्याच्या शक्यतेने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची उचलबांगडी होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच्या चर्चा राष्ट्रवादीने खोडून काढल्या असून काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्रातील पोलीस विभाग चांगलं काम करत आहे. मात्र कुठे जर चुकीचं होत असेल तर कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री अनिल देशमुख योग्य पद्धतीने काम करत असून त्यांचे मंत्रिपद जाईल असं मला वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, कोथरुडमध्ये खळबळ
बाळासाहेब थोरात यांनी घेतलेले पक्ष संघटनेविषयीचे निर्णय नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रद्द करतील, अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व आहे. कोणतेही निर्णय घेताना आमच्यात समन्वय आहे. पक्षात कोणताही वाद नसून सोशल मीडियातून वाद असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. मात्र असं काही असेल तर आम्ही चर्चेतून प्रश्न सोडवू,’ असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.
कोरोनाचे संकट पुन्हा वाढलं असून सर्वांच्या दृष्टीने हे काळजीचं आहे. वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा काळजीचा विषय झाला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आपण निष्काळजी झालो असून आपल्या कुटुंबाकरता आपण स्वतः काळजी घेणं गरजेचं असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.







