नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावर आता भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे.

लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला, त्यामागे ‘पीएमओ’च्या जवळील भाजप नेत्याचा हात आहे, असा संशय सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा आधार घेत सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी व्यक्त केला आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे. कदाचित त्यात काहीही तथ्य नसेल. ते खोटेही असू शकेल किंवा शत्रूंच्या आयटी सेलकडून वावड्या उठवल्या जात असतील की, ‘पीएमओ’च्या जवळील व्यक्तीने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम केले. त्यामुळे नीट तपासून माहिती घ्यावी, असे आवाहन सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये केले आहे.
याआधी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या हल्ल्यासाठी भाजपलाच जबाबदार धरले आहे. तर काँग्रेसने झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. तर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जावून जिंकलेलं नाही, असं इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली.







