जालना (वृत्तसंस्था) – जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. घनसावंगी तालुक्यातील माहेरजवळा, रांजनी, गुरुपिंपरी आणि शिंदेवडगाव येथे वादळी वाऱ्यासर गारांचा पाऊस झाला. त्याचबरोबर परतूर तालुक्यातील काही भागातही गारपीट झाली. त्यामुळे गहू पिकासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना शहरासह भोकरदन बदनापूर तालुक्यात रिमझिम पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान गारपीटीत नुकसान झालेल्या पिकांची दखल घेत शासनानं त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहे.