नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंजाब, हरयाणातील शेतकरी केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. तर, आमचे आंदोलन केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरूच राहणार असून दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग आम्ही बंद करू, असा मागील चार दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत चालल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कायद्याला नाव शेतकऱ्याचे, पण यातून अब्जाधीश मित्रांचे हित जपण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांशी चर्चा न करता शेतकरी कायदा कसा बनू शकतो? शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यामध्ये कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? शेतकऱ्यांचे म्हणने सरकारला ऐकावे लागेल. या आपण सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.







