एसटी महामंडळाच्या वाहकाची कुसुम्ब्यात आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या 3 महिन्यांपासून थकीत वेतनामुळे एस.टी. चे कर्मचारी त्रस्त झाले असतांनाच आता कुसुम्बा येथील मनोज अनिल चौधरी या वाहकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये एसटी महामंडळातील कार्यपद्धती व मराठी माणसाचे ठाकरे सरकार हे या स्थितीसाठी जबाबदार असल्याचे नमूद केल्याने एकच चर्चा सुरू आहे.
एस.टी. महामंडळातील कर्मचार्यांचे वेतन थकल्यामुळे हजारो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. या अनुषंगाने थकीत वेतनामुळे त्रस्त झालेले जळगाव आगारात कंडक्टर म्हणून काम करणारे मनोज अनिल चौधरी यांनी सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी जीवनयात्रा संपविली.
मनोज चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात म्हटले आहे की, एस.टी. महामंडळातील कमी पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एस.टी. महामंडळातील कार्यपध्दती आणि आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हे आहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझी पी.एफ. व एलआयसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती असे लिहिले आहे.
लॉकडाऊनमुळे एस.टी महामंडळ आर्थिक अडचणीत आले असल्याने कर्मचार्यांचे वेतन थकीत आहे. यातूनच ही आत्महत्या घडली आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, आरोग्यदुत अरविंद देशमुख ,पितांबर भावसार यांनी जिल्हा रूग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
सरकार रामभरोसे सुरू – आ.गिरीश महाजन यांनी टीका
सरकार रामभरोसे सुरू असून कुठल्याच संवेदना त्यांना राहिलेल्या नाहीत काय असा सवाल निर्माण झाला आहे. गेंड्याच्या कातडीचे हे सरकार असून तातडीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे. सरकारच्या संवेदना हरवल्या असून ते अपयशी ठरले आहे. तीन तिघाडा,काम बिघाडा सरकार नेमके कोण चालवतोय ते समजायला मार्ग राहिला नाही, असेही आ.गिरीश महाजन यांनी जिल्हा शासकीय महाविद्यालय येथे कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी आले असता यावेळी ते माध्यमांशी बोलताना सांगितले.