नवी मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास सुरू असून, सीबीआयसह ईडी आणि एनसीबी देखील या तपासात गुंतल्या आहेत. सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, हत्या की आत्महत्या या सर्व गोष्टी जगासमोर आणण्यासाठी त्याच्या बहिणी रात्रंदिवस लढत आहेत. मात्र, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात त्याच्या बहिणी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली होती.

या एफआयआरमध्ये असे म्हटले होते की, सुशांतच्या बहिणी कोणत्याही डॉक्टरी सल्लाशिवाय सुशांतला औषधे देत होत्या. ज्यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे दिली आहे. यामुळे सुशांतच्या बहिणींना अटक होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, मुंबई उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती सुशांतच्या बहिणी करत आहेत. सुशांतच्या बहिणींच्या मते, रियाने नोंदविलेल्या एफआयआरच्या संदर्भात सीबीआय त्याच्याविरूद्ध कारवाई करू शकते आणि त्यांना अटकही होऊ शकते. यामुळे प्रियंका आणि मितू यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांची सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे, अशी विनंती त्यांनी वकिलांमार्फत केली आहे.
सुशांतच्या बहिणींनी एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्द करावी आणि दोन्ही बहिणींवर कारवाई करावी. असे रिया चक्रवर्तीच्या वकिलाचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी खटला चालू आहे. आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 6 ते 8 सप्टेंबर या काळात एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 सप्टेंबरला तिला अटक झाली. 8 सप्टेंबर रोजी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचवेळी तिने महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application)केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला होता.रियाने 9 सप्टेंबर रोजी मुंबई सेशन कोर्टातील एनडीपीएस विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 11 सप्टेंबर रोजी पुन्हा सेशन कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर रिया आणि शौविक यांनी 22 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यावर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण पावसामुळे कोर्टाला सुट्टी असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली गेली.या दोघांच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत अखेर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला.







