मुंबई (वृत्तसंस्था) – शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शिवसेनेला साद घातली आहे. विशेष म्हणजे आठवलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही एनडीएसोबत येण्याचं आवाहन केलं आहे. आठवलेंनी सुचवला ‘२-३’ चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार मानले जातात. संजय राऊत सातत्यानं भाजपला अतिशय आक्रमकपणे लक्ष करत असतात. त्यामुळेच राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र ही भेट सामनासाठीच्या मुलाखतीसाठी झाल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. यानंतर आता आठवलेंनी शिवसेनेला साद घातली आहे. त्याचवेळी त्यांनी शरद पवारांनादेखील एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं, असं रामदास आठवले म्हणाले. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, असं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलं नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. ‘उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,’ असा पर्याय आठवलेंनी सुचवला. ‘भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील,’, असं आठवले म्हणाले.