जळगाव (प्रतिनिधी) – आमच्या संघर्षानंतर रेल्वे मंत्रालयाने स्थलांतराची प्रक्रिया सुरु केली आहेच. असे आम्ही मानतो. धक्क्या समोरील अत्यंत खराब झालेला रोड तयार करण्याचे, गटारी बांधण्याचे काम रेल्वे ने हल्ली सुरु केले आहे. हे स्वागताहर्य आहे पण जर सोबत सिमेंट लोडिंग अन्यत्र हलविले तर त्यामुळे ६०% धुळीचे प्रमाण कमी होईल. लवकरच रोड वरील खांबांवर दिवे, वृक्षारोपण व वेळोवेळी संबंधित व्यापाऱ्यांकडून धक्का साफ करून डम्पिंग ग्राउंड वर कचरा टाकला जाईल हि अपेक्षा आहेच. महत्वाचे म्हणजे मालधक्का स्थलांतर प्रक्रिया हि वेळखाऊ आहे कारण कधी पाळधी तर कधी शिरसोली व नंतर तरसोद अश्या बातम्या आल्यात शिवाय ह्या नंतर परवानग्या, मंजुऱ्या, आर्थिक तजबीज व विकसन कालावधी पाहता यात अनेक महिने जातील. आमची नेहमीची हि मागणी राहिली आहे कि सिमेंट ह्या ठिकाणी उतरवू नये. इतर गुड्स जसे धान्य, तांदूळ, खते व अन्य माल जो पर्यंत अन्यत्र मालधक्का स्थलांतर होत नाही तो पर्यंत येथेच उतराई करावी, त्यास आमची हरकत नाही. पण सिमेंट ला मात्र आमचा तीव्र विरोध आहे.


अनेक तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कित्येकांना श्वसनाचे आजार लागले आहे. हे डॉक्टरांच्या फाईल्स, एक्स-रे व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अहवाल पुराव्यांसह प्रत्येक वेळी तक्रारीत जोडलेले आहे. मा. रेल्वे प्रबंधक यांनी सदर तक्रार गांभीर्याने घेऊन सिमेंट उतराई ‘न्युगुड शेड भोईटे नगर’ येथे न करता, अन्य ठिकाणी करावी. अन्यथा आम्ही मालधक्क्यावरच उपोषणाला बसणार.







