नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारकडून कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली आहे. मात्र, त्याअंतर्गत कोरोनामुळे बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणारी 4 लाखांची मदत सरकारकडून मागे घेण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांपेक्षा कोरोनाग्रस्तांसाठी हा निधी वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने खळबळ उडाली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने दोघांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला होता. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.देशात आणि खासकरुन महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन चर्चा झाली. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोनामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसेच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील याविषयीही चर्चा केली.भारतात कोरोनाची लागण झाल्याने आधी कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा आणि दिल्लीत एका वृद्ध महिलेचा असे दोन मृत्यू झाले आहेत. दिल्लीतील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता. त्यानंतर मुलापासून आईला कोरोनाची लागन झाली होती. दरम्यान, मोदी सरकारने कोरोना हे राष्ट्रीय संकट घोषित केलं आहे.