औरंगाबाद (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षणबाबतच्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आता मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘आत्मबलिदान’ आंदोलन करण्यात येणार आहे. कायगाव टोका येथे आज (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेले मराठा समाजाच्या तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला 10 दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीदेखील सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचे रमेश केरे पाटील यांनी सांगितले.
काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. त्याच ठिकाणी उद्या आंदोलन करणार करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कायगाव टोका येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांकडून फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 42 कुटुंबातील व्यक्तीदेखील या आंदोलनात सामील होणार आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी महाधिवक्त्यांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले.







