नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऑडिओ टेप व्हायरलप्रकरणी राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केली असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
संबित पात्रा म्हणाले कि, राजस्थानमधील काँग्रेसचे नाटक खोटे आहे. २०१८ मध्ये सरकार स्थापनेवेळी काँग्रेसअंतर्गत दोन गटांमध्ये वाद झाला होता. यानंतर अशोक गहलोत हे मुख्यमंत्री झाले. मात्र, काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरुच होते. परंतु, घरातले भांडण रस्त्यावर आले आणि हायकमांड व हायकोर्टपर्यंत पोहचले.
तसेच फेयरमाउंट हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीवरही संबित पात्रा यांनी आरोप केले आहे. ते म्हणाले, फेयरमाउंट हॉटेल हे कंटेनमेंट झोनमध्ये येते. याठिकाणी बैठकीच्या वेळेस काँग्रेस आमदारांनी सोशल डिस्टंसिंग पाळले नाही. करोनासाठी निर्धारित नियमांचे पालनही केले नाही.
संबित पात्रांनी विचारले काँग्रेसला प्रश्न
– फोन टॅपिंग केले आहे?
– अधिकृतरीत्या फोन टॅपिंग केले आहे का?
– फोन टॅपिंगसाठी एसओपीला फॉलो करण्यात आले होते का?
– गहलोत सरकार स्वतःला वाचवण्यासाठी असंविधानिक मार्ग वापरत आहे का?
– राजस्थानध्ये राजकीय व्यक्तीचे फोन टॅप होतात का?
– राजस्थानमध्ये अप्रत्यक्षरीत्या आणीबाणी परिस्थिती झाली आहे का?
दरम्यान, ऑडिओ टेप प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही भाजपने केली आहे.