नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- देशात करोनाबाधितांचा आकडा हा दहा लाखांच्या पुढे गेला आहे. ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचे दहा ऑगस्टपर्यंत 20 लाख कोरोनाबाधित होतील, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे देशात आठवड्याभरात 10 कोरोना रुग्ण होतील, असे त्यांनी आठवड्यापूर्वीच सांगितले होते. आज देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशात 10 लाखांचा आकडा पार झाला आहे. या गतीने कोरोना वाढत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने या महामारीला रोखण्यासाठी ठोस, नियोजित पावले उचलायला हवीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,005,637 रुग्ण आहेत. तर 25,609 बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात 343,426 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 636,602 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 32 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 36,93,700 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 141,095 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.







