नवी मुंबई (वृत्तसंस्था) – भारत-चीन सीमेरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मागील ४-५ दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगडू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आय.जी यशस्वी यादव यांनी दिली.

या गोष्टींपासून रहा सावधान! चिनी हॅकर्स तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल किवा मेसेज पाठवू शकतात. Free Covid Test, Free Covid-19Kit अशा विषयाचा मेल किंवा मेसेज पाठवून काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाऊ शकते असेल. हा फेक ईमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. covid2019@gov.in किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा , अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.







